Breaking
Updated: सप्टेंबर 24, 2025
पिके सडली, नदीकाठी मातीच राहिली नाही; पंचनामे करता कशाचे?
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelखा.बजरंग सोनवणे यांचा सवाल, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांसोबत बांधावर जावून केली नुकसानीची पाहणी
बीड: दहा दिवसांपासून जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे.यामुळे नद्यानाल्यांना महापूर गेला. परिणामी, पाण्यामुळे पिके सडली आहेत. अनेक ठिकाणी मातीही खरडून गेली आहे. अशावेळी पंचनामे कशाचे करता, असा सवाल खा.बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. शिवाय ओला दुष्काळ जाहिर करून सरसकट मदत द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे हे बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आणि नुकसानपाहणीसाठी दौऱ्यावर आले होते. यावेळी खा.बजरंग सोनवणे, आ.संदिप क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, माजी आ.सलीम भाई, मेहबूब शेख ,उषाताई दराडे, सुशीलाताई मोराळे आदी प्रमुख पदाधिकारी सकाळपासून या दौऱ्यात सहभागी होते. बीड तालुक्यातील पिंपळवाडी, दत्तनगर, बेलखंडी, नागझरी, शिरापूर गात, शिरूर, आर्वी, नवगण राजुरी येथील व्यापारी व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. यावेळी पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, बीड जिल्ह्यात दहा दिवसातून किमान पाच दिवस अतिवृष्टी झाली आहे. शिरूर तालुक्यातून वाहणारी सिंदफणा, पाटोदा तालुक्यातून वाहणारी मांजरा नदीने रौद्ररूप धारण केले होते. नदीकाठी असलेल्या गावात पाणी शिरले. शेतातील पिके, जमीन, विहीरी डोळ्यादेखत वाहून गेल्या. कधी नव्हे इतके पाणी नागरिकांनी पाहिले. जिल्ह्यात जवळपास साडेतीनशे कोटींचे शासकिय मालमत्तेचे नुकसान झालेले आहे. तर शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे नुकसान किती असेल, याचा अंदाज येत नाही.यामुळे सरकारने पंचनामे करत बसण्यापेक्षा ओला दुष्काळ जाहिर करून सरसकट मदत करावी, अशी मागणीही खा.बजरंग सोनवणे यांनी केली.
००
तर बीडमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत महामोर्चा: आ.शिंदे
यावेळी प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे म्हणाले, बीड जिल्ह्यात शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले असून या अस्मानी संकटातून शेतकऱ्यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या वेदनांकडे शासन लक्ष देत नसल्याचे चित्र समोर आल्याने प्रचंड आक्रोश शेतकरी बांधवांमध्ये आहे. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनाप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आधार द्यावा. राज्य सरकार व ठोस पाऊल उचलत नसेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस खांद्याला खांदा देऊन उभी राहणार आहे. नाशिकप्रमाणे बीडमध्ये सुद्धा पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये महामोर्चा काढला जाईल, अशी माहिती यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.