Breaking
Updated: सप्टेंबर 23, 2025
बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकऱ्यांना ५६ कोटींचा दिलासा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : राज्यात जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार एकूण १३३९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल ५६ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने आणि पुरामुळे अमरावती, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागातील शेतीचे प्रचंड नुकसान होऊन १५ लाख ४५ हजार २५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (दि.२३) शासनाने जाहीर केल्यानुसार या पाच महसुली विभागातील विभागातील एकूण १९ लाख २२ हजार ९०९ बाधित शेतकऱ्यांना एकूण १३३९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाला सर्वाधिक म्हणजे ७२१ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या अतिवृष्टीत बीड जिल्ह्यातील ६६ हजार ७३१ हेक्टर क्षेत्र बाधित होऊन १ लाख 14 हजार ७७३ शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल ५६ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
या अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT पद्धतीने जमा केली जाणार आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एका हंगामात एका शेतकऱ्याला एकदाच मदत दिली जाईल. लाभार्थ्यांची यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून पुढील हंगामासाठी पीकपेरणीसाठी मोठी मदत होणार आहे.