Breaking
Updated: सप्टेंबर 17, 2025
बीड-अहिल्यानगर रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण:आज श्रेयवादाचा नाही, तर आनंदाचा दिवस - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड – अनेक वर्षांची प्रतीक्षा, तीन पिढ्यांचे स्वप्न आणि अथक प्रयत्नांनंतर अखेर आज मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर बीडच्या भूमीवर रेल्वे धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. बीडमध्ये सुरू झालेली ही रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण करतो असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले.
बीड ते अहिल्यानगर रेल्वेमार्गावर पहिली गाडी धावल्यामुळे बीड जिल्ह्याचा रेल्वे नकाशावर समावेश झाला आहे. या सोहळ्याला खासदार बजरंग सोनवणे आणि जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी बीडकरांनी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज बीडच्या जनतेच्या स्वप्नपूर्तीचा योग आहे. केशरकाकू क्षीरसागर, गोपीनाथराव मुंडे यांनी रेल्वेचे स्वप्न बघितले. पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचे असते, आम्ही गोपीनाथराव मुंडे यांना ही रेल्वे अर्पण करत आहोत. रेल्वे संघर्ष समितीचे देखील मी अभिनंदन करतो. या रेल्वेसाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. बीडमध्ये रेल्वे नव्हे तर विकासाची वाहिनी पोहोचली.
रेल्वे प्रकल्पात जमीन अधिग्रहण अवघड काम होते, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सगळ्या प्रकल्पांमध्ये 50 टक्के सहभाग राज्य घेईल असे पत्र आम्ही केंद्र सरकारला दिले. या आधीच्या सरकारने मराठवाड्याच्या रेल्वेसाठी फक्त 400 कोटी रुपये दिले होते. पण गेल्या 10 वर्षांत मराठवाड्यासाठी 21 हजार कोटी रुपये दिल्याचे ते म्हणाले.
*मराठवाड्यातील दुष्काळ संपवणार*
मराठवाड्याच्या पुढच्या पीढीला दुष्काळ बघू देणार नाही. कोल्हापूर-सांगलीमध्ये जो पूर येतो ते पाणी उजनीला आणणार आणि तिथून ते पाणी मराठवाड्यात आणणार. वेगवेगळ्या माध्यमातून मराठवाड्यातील दुष्काळ संपवणार. त्यासंबंधी हे सरकार काम करत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या 30-35 वर्षांपासून बीड जिल्ह्यात रेल्वे यावी, ही येथील जनतेची मागणी होती. दळणवळणाचे एक महत्त्वाचे साधन म्हणून रेल्वेचे महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. बीडकरांचे हे स्वप्न दिवंगत नेत्या केशरकाकू क्षीरसागर यांनी पहिल्यांदा पाहिले आणि त्याची मागणी केली होती. त्यानंतर, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनीही त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
आज या स्वप्नाची पूर्तता झाल्याचा आनंद बीडकरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक नवीन रेल्वे पाहण्यासाठी आले होते. अनेकांनी रेल्वेसोबत सेल्फी घेतले, फोटो काढले आणि हा अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद केला.