Breaking
Updated: July 19, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupबीड : जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या पारगावजवळ धुळे-सोलापूर महामार्गावर शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली कार पलटी होऊन दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात मृत्यू झालेले दोघे तरुण हे औरंगाबादचे रहिवासी आहेत. त्यांची नावे ऋषिकेश अवताडे (वय २७ वर्षे) आणि अजिंक्य लिंबे (वय २१ वर्षे) अशी आहेत. तर मयूर गवांडे (वय २५ वर्षे) आणि रोहन जाधव (वय २४ वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
ही XUV 700 कार (MH 20 HB 9776) औरंगाबाद येथून तुळजापूरकडे निघाली होती. पारगावजवळ आल्यानंतर भरधाव वेगामुळे कारचा ताबा सुटून ती रस्त्याच्या खाली पलटी झाली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी तातडीने उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हलवले. अपघातानंतर काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी योग्य व्यवस्था करून वाहतूक सुरळीत केली.
अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला आहे. महामार्ग पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.