Breaking
Updated: जुलै 10, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘स्वाराती’ मधील कर्करोग विभाग पुनःश्च सुरू करण्यास शासनाचे प्राधान्य : ना. हसन मुश्रीफ
विधानसभेत आ. नमिता मुंदडा यांच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस आश्वासन
अंबाजोगाई : राज्य शासनाच्या आगामी कर्करोग धोरणांतर्गत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कर्करोग विभाग प्राधान्याने सुरू करण्यात येईल, त्यासोबतच विविध आजारासंदर्भातील सुपरस्पेशालिटी विभाग सुरू करण्यात येतील अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. केज मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (स्वाराती) या ग्रामीण भागातील एकमेव सरकारी वैद्यकीय संस्था असून, येथे केवळ मराठवाडाच नव्हे तर विदर्भातीलही रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. सध्या मंजूर खाटांच्या तिप्पट रुग्णसंख्या, तसेच वाढलेली विद्यार्थी संख्या लक्षात घेता मनुष्यबळ, यंत्रसामुग्री, पायाभूत सुविधा यांची तातडीने पूर्तता गरजेची आहे.
या पार्श्वभूमीवर आ. नमिता मुंदडा यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात स्वाराती रुग्णालयाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या. सध्या पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी १५० विद्यार्थी प्रवेश घेत असूनही फक्त ५० विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसारच मंजूर मनुष्यबळ कार्यरत आहे. त्यामुळे वर्ग १ ते ४ संवर्गातील अतिरिक्त पदे मंजूर करून त्यांची तत्काळ पदस्थापना करावी, अशी मागणी त्यांनी केली.
त्याचप्रमाणे, वाढलेल्या रुग्णसंख्येनुसार खाटांची संख्या ९२० पर्यंत वाढवून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ मंजूर करावे. पूर्वी कार्यरत असलेला कर्करोग विभाग काही कारणास्तव बंद करण्यात आला होता. त्यामुळे गरीब रुग्णांना उपचारासाठी लांबवर जावे लागते. त्यामुळे कर्करोग तपासणी व उपचार युनिट पुन्हा सुरू करण्याची त्यांनी आग्रही मागणी केली.
याशिवाय संस्थेमध्ये बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रम नव्याने सुरू करणे, जीएनएम विद्यार्थ्यांची संख्या २० वरून १०० करणे, तसेच नवीन विविध सुपरस्पेशालिटी युनिट्स सुरू करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
आ. नमिता मुंदडा यांच्या या ठोस मागण्यांवर उत्तर देताना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वाराती रुग्णालयात कर्करोग विभाग पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य दिले जाईल, न्युरोलॉजी, कार्डिओलॉजी, न्युरोसर्जरी यासारखे सुपरस्पेशालिटी विभाग सुरू करण्यात येतील अशी ग्वाही दिली. तसेच वित्तमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संस्थेला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही व सर्व प्रलंबित कामे चालू वर्षाअखेरपर्यंत पूर्ण केली जातील, असे स्पष्ट केले.
या घोषणेमुळे स्वस्त व खात्रीशीर उपचारासाठी स्वारातीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.