प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा जास्तीत जास्त कामगारांनी लाभ घ्यावा
-निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव-पाटील
बीड : बीड - प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना जास्तीत जास्त कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी केले. देशात 30 नोव्हेंबर पासून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना जनजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सरकारी कामगार अधिकारी सुरेंद्र राजपूत, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प संचालक ओम प्रकाश गिरी, नागरी सेवा केंद्राचे बाळासाहेब कदम, विविध कामगार व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, असंघटित कामगार व शासकीय अधिकारी कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यासाठी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांनी आज पासून नोंदणी शिबिराचे सुरुवात करण्यात आल्याची घोषणा केली असून ह्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात माहिती देण्यात आली. याबाबत उपस्थित लाभार्थ्यांना लघु चित्रपट दाखवून योजनेचे महत्त्व पटवून देण्यात आले.
